Sunday, 8 March 2020

महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा

      महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा

       महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी जो लढा दिला त्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.काय होता हा लढा, तर संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळपास जगभरातल्या स्त्रीयांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता. त्याविरोधात महिलांनी लढा उभारला होता. त्याचवेळी जर्मनीतल्या कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकिन प्रभावित झाली.असा एखादा दिवस असावा, ज्या दिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढय़ाचा निर्धार व्यक्त करू शकतील अशी कल्पना मांडली. 1910 मध्ये कोपनहेगनला झालेल्या परिषदेत 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ठराव पास झाला, पण हिंदुस्थानात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा झाला
        8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल. आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात.
      पूर्वी महिलांविषयी फक्त चूल आणि मूल असं म्हटलं जायचं. म्हणजे महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूलबाळ सांभाळायचं एवढंच तिचं काम असं मानलं जायचं. पण आज परिस्थिती बदललेली आपल्याला दिसतेय. आज महिला या चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. पूर्वी जिथं महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसं वागल्यावर कमीपणा समजला जायचा त्याच महिलेच्या हाताखाली पन्नास पन्नास लोकं काम करताना आपल्याला दिसतंय. म्हणून तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय.
          खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात. पूर्वी या गोष्टी खूप कमी पाहायला मिळायच्या. आणि समजा एखाद्या वेळेस आईवडील आपल्या मुलीला शिकवायचं आहे आणि जेव्हा ती मुलगी शिकू लागायची तेव्हा तिला व तिच्या आईवडिलांना समाजाचा इतर घटकांशी खूप सामना करावा लागायचा. कारण त्या काळात 15 ते 17 या वयोगटातच मुलीचं लग्न करून मोकळ व्हायचे आणि मनातल्या मनात एक सुटलो बाबा एकदाचा असा सुटकेचा श्वास घ्यायचे. पण आज सर्व बदलले आहे. आज महिला स्वतंत्ररीत्या जगत आहेत, त्यांचे निर्णय त्या आज स्वतः घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलटपासून तर मेट्रोच्या पायलट पर्यंत त्या आपल्याला पाहायला मिळतात. जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलाच काम किंवा हे महिला करू शकत नाही असं समजलं जायचं तिथं आज महिला आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करताना आपण पाहतोय. त्याच महिला पूर्वी घराबाहेर निघायला घाबरायच्या त्याच महिला आज परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालताना आपल्याला दिसत आहेत. बाकी काहीही असो, 8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल व दुसऱया महिला ज्या आज पण घराबाहेर पडायला किंवा काही काम किंवा नोकरी करायला थोडं लाजत आहेत किंवा थोडं समाजाला घाबरत असतील त्यांनासुद्धा या यशस्वी महिलांचा सत्कार व सन्मान पाहून त्यांच्या मनातसुद्धा वाटेल की या महिला करू शकतात तर आपण का नाही? इतर माहिलांसारख्या त्या पण घराबाहेर पडतील आणि त्यांना ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टी त्या करू लागतील. आजची स्त्री महिला राष्ट्रपती लोकोपायलट, वकील, पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर, तहसीलदार, जिल्हाधिकारी, लष्करामध्ये लेप्टनंट,उत्तम शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे.कुठल्याच क्षेत्रात आजची स्त्री मागे नाही.
             आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या त्या जगाचा उद्धार करणाऱ्या, दैवत असणाऱ्या, ज्या स्त्री शक्तीची नवरात्रात पूजा केली जाते, त्या स्त्रीयांची परिस्थिती कशी आहे? तीनशे पासष्ट दिवसांत एक दिवस महिला दिवस साजरा करून त्यांचा मानसन्मान केला जातो. बाकीच्या तीनशे चौसष्ट दिवसांचे काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्रीया किती सुरक्षित आहेत? रोजच वर्तमानपत्र उघडले तर त्यात महिलांचे शोषण, विनयभंग, बलात्कार, खून अशा बातम्या असतातच. अगदी पाच-सात वर्षांच्या मुलींपासून साठ-पासष्ट वर्षांच्या महिलांचा त्यात समावेश असतो. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
           समाजात, शाळेत, नोकरीच्या ठिकाणी, नातेवाईकांत, प्रवासात एकटी स्त्री किती सुरक्षित आहे? अशातच घडलेली आंध्र प्रदेशमधील बलात्कार व त्यानंतर हत्या, विदर्भातील हिंगणघाटची घटना, संभाजीनगर, सिल्लोडची घटना आणि अशा अनेक ठिकाणी दररोज घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना काय दर्शवितात? अनेक कार्यालयांत महिला कर्मचाऱयांच्या विनयभंगासारख्या घटना घडतात, त्यांचे शोषण होते. त्या घटना दाबून टाकल्या जातात. राज्यात महिला आयोग आहे. त्याने अशा घटनांची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असते, पण राजकीय दबावामुळे काही होत नाही. बलात्कार, स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये कारवाईस विलंब होतो. काही वर्षे निघून जातात. त्या घटनेचे गांभीर्य राहत नाही. निर्भया प्रकरणात काय झाले बघतोय आपण. आंध्र प्रदेश सरकारने कॅबिनेटमध्ये 'दिशा' कायदा मंजुरी दिली. सात दिवसांत तपास, चौदा दिवसांत न्यायालयीन कामकाज आणि एकवीस दिवसांच्या आत आरोपीस मृत्युदंड. याच धर्तीवर संपूर्ण देशात असा कायदा लागू व्हावा, त्याने अशा घटनांवर जरब बसेल.
ज्या महिलांना समाजकार्य, राजकारणाची आवड असते त्यांना मात्र संधी मिळत नाही. खऱ्या अर्थाने स्त्रीयांचा सर्वच क्षेत्रांत सहभाग कमीच आहे. जोपर्यंत महिला सक्षमपणे उभ्या राहत नाहीत; त्यांच्या निर्णय क्षमतेला मोकळेपणाने वाव मिळत नाही तोपर्यंत स्त्री मुक्त आहे हे खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही. स्त्रीविषयक अनेक कायदे आहेत, महिलांना मिळणाऱ्या सवलती आहेत, त्यांची अधिकाधिक माहिती महिलांपर्यंत पोहोचावी, स्त्री अत्याचारविरोधी कायदा कडक करून आंध्र प्रदेश धर्तीवर संपूर्ण देशात लागू होऊन अंमलबजावणी व्हावी आणि महत्त्वाचे, मुळातच स्त्रीयांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलावा. ज्या महिलांमध्ये काही कर्तृत्व आहे, त्यांना संधी प्राप्त करून द्यावी.

संतोष नन्नावार
सहा. शिक्षक तळोधी
जि:चंद्रपूर

Wednesday, 4 March 2020

मुलांच्या परीक्षेच्या काळात "पालकांनी" या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिलंच पाहिजे!


मुलांच्या परीक्षेच्या काळात "पालकांनी" या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिलंच पाहिजे!

परीक्षा हा मुलांसाठी आणि पालकांसाठी कठीण काळ असतो. परीक्षेच्या दिवसांमध्ये ताण तणाव, वेळेचं नियोजन, अभ्यास याचे नियोजन मुलांना करावं लागतं.
त्यातच पालकांच्या अपेक्षा आणि एकंदर भविष्याची आणि करिअरची चिंताही असते त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये मुलांना पालकांचे सहकार्य हवे असते.
पालकांनी सामंजस्याने ही परिस्थिती हाताळायची असते. पालकांनी मुलांना मदत केली, अभ्यासात सहकार्य केले तर निश्चितच मुलांना त्याचा फायदा होतो.
जाणून घेऊया पालकांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
१. इतर मुलांशी तुलना नको
        
प्रत्येक मुलाकडे स्वतःची एक विशेष कला, गुणवैशिष्ट्य असतं. त्यामुळे इतर मुलांशी मुलांची तुलना पालकांनी करू नये.खास करून बोर्ड परिक्षेच्या काळामध्ये अशाप्रकारची तुलना केल्याने मुलांवर ताण येऊ शकतो त्यामुळे त्याचे भान राखले पाहिजे. पालकांची सर्वात मोठी चूक असते की, ते आपल्या मुला-मुलींची तुलना दुसऱ्या मुला-मुलींसोबत करतात.स्कोअरबाबत दुसऱ्या मुलांचं कौतुक करतात आणि आपल्या पाल्यांना ओरडतात. असं केल्याने मुला-मुलींचा आत्मविश्वास कमी होतो.त्यामुळे तुमच्या पाल्यांची तुलना इतरांशी करणे बंद करा. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या आणि नेहमी त्यांच्या बाजूने उभे रहा.

२. ग्रुप स्टडीने ताणावर नियंत्रण

पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी सर्वात चांगले सपोर्ट सिस्टम असता पण एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा मित्रांनी एकत्र येऊन अभ्यास केला तर त्याचा फायदा मुलांना होतो.यामध्ये अभ्यास तर होतोच पण मुलांना ताण न येता अभ्यासाबरोबरच आनंदही मिळतो. शिवाय तुम्ही आजूबाजूला असल्यावर त्यांच्यावर लक्षही राहतं त्यांना अभ्यासात काही कन्फ्यूजन झालं तर ते तुम्हाला विचारूही शकतील. मुलं एकत्र अभ्यास करत असताना एकमेकांना प्रश्न विचारून अडचणी आणि वेगवेगळे डाऊट्स सोडवतात.
यामुळे खेळीमेळीमध्ये त्यांचा अभ्यासही होतो.

३. ब्रेक हवाच

अभ्यासादरम्यान ब्रेक घेणं सुद्धा गरजेचं असतं, याने त्यांच्या मेंदूला आराम मिळतो आणि त्यांना फ्रेश वाटतं. तसेच असं केल्याने अभ्यासावरही चांगलं लक्ष केंद्रीत होतं.
तीन चार तासांच्या अभ्यासानंतर थोडासा ब्रेक मुलांना फ्रेश करू शकतो. त्यामुळे मुलांना त्यामध्ये अडवू नका.
ब्रेक घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा आणि वेळेवर तुम्ही लक्ष द्या. अभ्यास आणि ताण यांचे नियोजन करायला यातून मदत होऊ शकते.

४. आहाराकडे लक्ष

परिक्षेच्या दिवसांमध्ये मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. टेंशनमुळे अनेकदा मुलांचं खाण्याकडे लक्ष नसत, उपाशीपोटी अभ्यास केल्याने किंवा पेपरला गेल्याने तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.आणि याचा परिणाम परिक्षेवर होऊ शकतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देऊन मुलांनी परिक्षा देणे आवश्यक आहे. योग्यवेळी योग्य आहार, सकस अन्न मुलं खात आहेत की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.शिवाय भोजनाच्या वेळी एकत्र जेवून वातावरण हलकेफुलके राहिल याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.शक्यतो परिक्षेच्या काळात फास्टफूड आणि जंक फूड टाळले पाहिजे.

५. ताण नियंत्रण

परिक्षेचा ताण मुलांएवढाच पालकांवरसुद्धा असतो. हा ताण नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. तुमचा ताण मुलांसमोर आणू नका. शक्यतो पेपरबद्दल किंवा किती अभ्यास झालाय याबद्दल मुलांशी सतत चर्चा करू नका.
तुम्ही तुमच्या मुलांना स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं याचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही स्वत: पॅनिक झालात, तुमच्या मनातील ताण त्यांच्यासमोर आला तर मुला-मुलींवर अधिक जास्त दबाव येईल.याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल त्यामुळे आधी तुम्ही शांत रहा आणि घाबरू नका. याने मुलं शांत होऊन अभ्यास करू शकतील.

६. वेळेचे नियोजन

मुलांना मोकळा वेळ दिला असला तरीही त्यांच्या वेळेच्या नियोजनावर पालक म्हणून लक्ष दिले पाहिजे. मात्र हे करताना कारणाशिवाय मुलांवर ओरडू नये.
मुला-मुलींना अभ्यासावर फोकस करण्यासाठी सतत त्यांच्यावर ओरडल्यास त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यापेक्षा त्यांच्यासोबत बसा आणि त्यांना मदत करा.
तसेच त्यांच्यापासून स्मार्टफोन, टीव्ही, सोशल मीडियाही दूर ठेवा. परिक्षेच्या काळात या गोष्टी, त्यावर येणारे मेसेजेस यांचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळेचे नियोजन करताना या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे.मात्र घरातील इंटरनेट किंवा टीव्ही बंद करून मुलांना सतत फक्त अभ्यास अभ्यास करायला लावू नये. त्यापेक्षा ब्रेकमध्ये त्यांना याचा वापर करण्याची मुभा असावी ज्यामुळे त्यांना अपडेटेड राहता येईल.तुम्ही तुमच्या पाल्यासाठी एक ठराविक वेळापत्रक तयार करून द्या आणि त्याचे पालन होईल याकडे लक्ष द्या.
यामुळे ताण येणारे नाही आणि ते योग्य प्रकारे अभ्यासही करू शकतील.

७. सकारात्मक वातावरण

दहावी बारावीची परिक्षा ही आयुष्याची शेवटची परीक्षा नसते हे पालकांनी लक्षात घ्या. याचबरोबर या परीक्षांबद्दल मुलांना घाबरवू नका. त्यापेक्षा घरात प्रसन्न वातावरण राहिलं याकडे सर्वांनी लक्ष द्या.
सर्वच पालकांना असं वाटत की, त्यांच्या मुला-मुलींनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी. पण यासाठी कोणीही मुलांवर दबाव टाकू नये. म्हणूनच घरात सकारात्मक वातावरण तयार करा.
ज्यामुळे मुलं घरामध्ये मोकळ्या वातावरणात अभ्यास करू शकतात.

८. पेपरबद्दल चर्चा नको

एखादा झालेला खराब पेपर किंवा राहिलेले प्रश्न याबद्दल पालकांनी अजिबात चर्चा करू नये. तसच एखाद्या पेपरमध्ये किती मार्क मिळतील याचा अंदाज मुलांना लगेच घ्यायला सांगू नये.त्यापेक्षा पुढील पेपर, त्यातील अडचणी, मुलांचे प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मुलांना आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरं जाता येईल.

संतोष दामोधर नन्नावार
सहा.शिक्षक लोक विद्यालय तळोधी(बा)
nannawarsantosh83@gmail.com

Monday, 2 March 2020

उद्यापासून होणार १० वी च्या परीक्षेला सुरवात,पेपरला जातांना घ्या ‘ ही ’ काळजी

उद्यापासून होणार १० वी च्या परीक्षेला सुरवात,पेपरला जातांना घ्या ‘ ही ’ काळजी..


इयत्ता १०वी ची (३ मार्च) उद्यापासून सुरू होत आहे. राज्यातील १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही हॉल तिकीट ऑनलाइन मिळणार आहे. परीक्षा केंद्रावर जातांना  हॉल तिकीट आणि आपले आयडी कार्ड घेऊन जाने अनिवार्य आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात सुमारे २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहे.
आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला आपला पेपर चांगला सोडवावा लागेल. खूप तयारी करूनही परीक्षेच्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रावर लवकर पोहचा. परीक्षा केंद्रावर जातांना परीक्षेसाठी आवश्यक असणार्‍या सर्व वस्तु आपल्या सोबत ठेवा. आणि पेपर कसं सोडवायचा याचे नियोजन करूनच पेपर सोडवा. म्हणजे तुमचा पेपर चांगला सोडवता येईल.

परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सूचना

परीक्षेच्या केंद्रावर लवकर पोहचा.
पेपर सोडवितांना गडबड करू नका.
सुटसुटीत व मुद्देशीर पेपर सोडवा ,खोडतोड करू नका.
वेळेचे नियोजन करून पेपर सोडवा.

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...